मनोहर शेवाळे | Edited By: सिद्धेश सावंत
May 24, 2022 | 8:54 AM
नाशिकः नाशिकमधील कळवण तालुक्यातील (Taluka Kalwan) मौजे शिवभांडणे शिवारातील धरणाच्या मोरीचा (Dam Water) दरवाजा रात्रीच्यावेळी अज्ञात व्यक्तीने उघडून दिल्याने शेतीसह पिकांचे नुकसान (Damage to crops including agriculture) होऊन ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाण्याचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शिव भांडणे येथील लघू पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पाचा सांडावा तसेच पाटचारीची दुरूस्ती न केल्यामुळे मागील दोन ते तीन वर्षांपासून या धरणातून पाणी सोडले नसल्याचे समजते.
पाणी सोडण्याच्या गेटच्या गळतीच्या थोडेफार पाण्याचा वापर करून शेतकरी शेती पिकवतात, त्यामुळे धरणातील पाणी कमी झाले आहे. धरणात सध्या थोडाफार पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र वारंवार मागणी करूनही पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी धरणाचे दरवाजे उघडे केल्याने रात्रभर पाणी धरणाखालील शेतात शिरले. यामध्ये भांडणे येथील शेतकरी सखाराम भोरू गायकवाड, शंकर कुवर व चंद्रकांत कुवर यांच्या कांदा पिकासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांवर आधीचे मोठे संकट असल्याने दुसरे हे पाण्याचे संकट उभा राहिले आहे. कांद्याचा भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने आमच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
कळवण तालुक्यातील मौजे शिवभांडणे शिवारातील धरणाच्या मोरीचा दरवाजा रात्रीच्यावेळी ज्या अज्ञात व्यक्तीने उघडला आहे. त्याचा शोध घेण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. शेतातील कांदा पाण्यामुळे वाया जाणार असल्याने लाखो रुपयांच्या नुकसानीचा सामना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682