बोलून बातमी शोधा
पिकाऊ जमिनीवर आरक्षण टाकल्यास आंदोलन
हातकणंगलेतील शेतकऱ्यांचा इशारा; पुनर्विचाराचा ठराव केल्याची माहिती
हातकणंगले, ता. १४ ः शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनीवर नगरविकास आराखड्यानुसार आरक्षण न टाकता नगरपंचायतीच्या हद्दीत असलेल्या शासकीय जमिनी, अतिक्रमित जमिनीवर आरक्षण टाकावे, अन्यथा अल्पभूधारक शेतकऱ्यांना भूमिहीन करू पाहणाऱ्या शासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना दिला.
हा प्रारूप विकास आराखडा अमान्य असून पुनर्विचार करण्याबाबतचा ठराव नगरपंचायतीने केल्याची माहिती नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर व उपनगराध्यक्ष केतन कांबळे यांनी दिली. हातकणंगले नगरपंचायतीकडून पिकाऊ जमिनीवर आरक्षण टाकण्यात येत आहे. याविरोधात शेतकरी एकवटले आहेत. नगरपंचायतीकडून नगरविकास आराखड्यानुसार गावाच्या सुशोभीकरणासाठी जमीन आवश्यक असल्याने शेतकऱ्यांच्या १८८ हेक्टर जमिनीवर आरक्षण टाकले आहे. यात नगरपंचायतीच्या मालकीच्या जागा, गायरान, पडीक जागांवर आरक्षण टाकलेले दिसत नाही. तसेच आरक्षणामध्ये सलगता नसून सर्वसामान्य शेतकरी भरडला गेला आहे. याबाबत नागरिकांनी एकत्रित येऊन नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांना जाब विचारला. अल्पभूधारक शेतकऱ्यांना भूमिहीन होण्यापासून वाचवावे, अशी विनंती नगरपंचायतीला केली. डॉ. अभिजित इंगवले, पृथ्वीराज इंगवले, बापूसाहेब ठोबरे, विठ्ठलराव मुसाई, जयकुमार दुग्गे, गुंडोपंत इरकर, बाबासो ठोबरे आदी उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

Article Tags:
news